चिखली, बातमीवाला: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या बोरगाव काकडे या गावातील शेतकरी शेषराव सुधाकर सोरमारे यांना नुकताच दिल्लीत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात मिलियनेयर फार्मर ऑफ द इयर २०२५ हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शेषराव यांचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय आहे, जो त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला आणि भाजीपाल्याच्या पिकांवर भर देऊन कामाला सुरुवात केली.

शेतीची आवड असल्याने शेषराव भाऊ यांनी भाजीपाल्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले. विशेषतः टोमॅटोच्या पिकातून त्यांनी आपले आर्थिक स्तर उंचावले, जे त्यांच्या जिद्दी आणि अथक परिश्रमाचे फळ आहे. कालांतराने त्यांना भाजीपाल्याच्या आणि फळपिकांच्या शेतीत खूप अनुभव आला. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. हळूहळू हे मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि ते मोफत स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
आजपर्यंत शेषराव भाऊ यांनी हजारो शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान सुधारले आहे. ते विशेषतः जैविक शेतीवर भर देतात. जैविक निविष्ठांचा वापर करून उत्पादन कसे वाढवावे, मातीचे आरोग्य कसे जपावे आणि तिची सुपीकता कशी वाढवावी यावर ते सातत्याने काम करतात. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिले आहे.

शेषराव भाऊंनी केवळ स्वतःचे जीवनमान उंचावले नाही, तर इतर शेतकऱ्यांना देखील मदत करून पर्यावरणस्नेही शेती आणि मातीच्या आरोग्यावर काम करत एक आदर्श घडवला आहे. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे दिल्लीत मिळालेला हा पुरस्कार, जो त्यांच्या शेतीतील योगदानाची ओळख आहे.















