चिखली (बातमीवाला): येथील जाफ्राबाद रोडवरील पानगोळे हॉस्पिटल ते चांदई गोदरी फाटा आणि पळसखेड दौलत ते पळसखेड दौलत फाटा या दोन रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचा सुळसुळाट झाल्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण आणि दुरुस्ती करावी, तसेच जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन ओमराजे मदन राजे गायकवाड (शिवसेना (शिंदे गट) विध्यार्थीसेना तालुका प्रमुख) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना सादर केले. यावेळी शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या वाढल्याने या रस्त्यांवर अनेक अपघात घडले असून, काहींना गंभीर जखमा आणि अपंगत्व आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी या रस्त्यांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. शेतकऱ्यांना मोटारसायकल वर भाजीपाला तसेच दूध घेऊन तालुका मुख्यालयापर्यंत नेण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रिक्षाचालकांना प्रवासी वाहतुकीत अडथळे येत असून, सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड कसरत करावी लागत आहे.
भेंडवळच्या घटमांडणी प्रमाणे घडत आहेत या घटना: आजपर्यंत ही भाकीते झाली खरी; वाचा सविस्तर माहिती
निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्याला लागून असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करत किमान खड्डे बुजवण्याची तरी तातडीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांचे मजबुतीकरण आणि दुरुस्ती त्वरित करावी, तसेच ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यासंदर्भात ओमराजे गायकवाड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर २३ सप्टेंबर २०२५, मंगळवारपर्यंत रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली नाही, तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर किंवा चिखली-जाफराबाद रोडवर आमरण उपोषणाला बसतील. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी, तसेच अमरावती येथील अभियंता यांना पाठवण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना संजय जाधव, नितीन गायकवाड, वैभव वाघमारे, सतीश गायकवाड, प्रवीण गायकवाड, सावता सपकाळ, धनंजय राजपूत, रवी पवार यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. स्थानिकांमध्ये या विषयावर तीव्र भावना असून, प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.















1 thought on “चिखली जाफ्राबाद रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण; शिवसेना विध्यार्थी सेने कडून ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी”