बुलढाणा (बातमीवाला): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत प्रचंड गोंधळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे तब्बल सात हजार पाचशे दुबारिक नावे सापडली असून, पाच हजार हुन अधिक मृत व्यक्तींची नावेही यादीत कायम आहेत. याच मृत नावांवर मतदान झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने केलाय. विशेष म्हणजे सागवन गावात एकाच घरात १२६ मतदार राहत असल्याचं दाखवलंय, तेही हिंदू, मुस्लिम, बौद्ध असा सर्वधर्मीय मेळ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा घोळ नीट करा आणि बोगस नावे काढून टाका, असा आग्रह शिवसेना (उबाठा) च्या प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि नेते डी.एस. लहाने यांनी पत्रकार परिषदेत केला.
बुलढाण्यातील हॉटेल रामा ग्रँडच्या सभागृहात दुपारच्या सुमारास झालेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेत नेत्यांनी मतदार यादीचं पूर्ण ‘पोस्टमॉर्टम’ केलं. मतदार क्रमांक, पान क्रमांक आणि घर क्रमांकानुसार घोळ उघड करत ते म्हणाले, की फक्त ८४१ मतांच्या फरकाने झालेल्या पराभवामागे बोगस मतदार, मृत नावांवर मतदान आणि बूथ कॅप्चरिंगसारखे कुटील उद्योग आहेत. जयश्री शेळके यांनी सागवन, सुंदरखेड आणि मोताळा तालुक्यातील निपाणा गावांचे प्रातिनिधिक उदाहरणं मांडली. निपाणा गावात ११२६ मतदार आहेत, त्यापैकी १३२ मृत. तरीही त्यांच्या नावांवर मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. सुंदरखेड यादीतील क्रमांक ५०६ च्या मतदाराबद्दल बोलताना शेळके म्हणाल्या, हा व्यक्ती पंधरा वर्षांपूर्वी गेलाय, तरी नाव अजूनही यादीत! २००४ मध्ये सरदारसिंग देवसिंग गायकवाड यांचं निधन झालं, पण २१ वर्षांनंतरही ‘दिवंगत सरदारसिंग’ मतदार यादीत जिवंत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मृत-बोगस नावे हटवावी आणि दुबारिक नावं वगळावीत, अशी मागणी त्यांनी केली.
डी.एस. लहाने यांनी सांगितलं, की यादी क्रमांक २६३ ते २७५ पर्यंतचे १२६ मतदार एकाच घरात! एक हजार चौरस फूटाच्या या छोट्या घरात हे सगळे कसं शक्य? मजेदार बाब म्हणजे हे सर्व वेगवेगळ्या जाती-धर्मांचे – हिंदू, मुस्लिम, बौद्ध! शिवाय, घराचा पत्ता नसलेल्या ३८३५ मतदारांची नावंही यादीत. सागवनचे मतदारांचं घर बुलढाणा किंवा सावरगांव डुकरे कसं असू शकतं?, असा सवाल उपस्थित करत लहाने यांनी घोळ थांबवण्याची मागणी केली.
हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवर कलंक आहे. स्थानिक निवडणुकांपूर्वी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरणार, असा इशाराही नेत्यांनी दिलाय.














