चिखली (बातमीवाला): चिखली तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाश्वत आणि व्यापक सामाजिक-आर्थिक ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ‘परिवर्तन प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. HDFC CSR अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील खालील २० गावांची निवड करण्यात आली आहे:
आंधई, भरोसा, चंदनपूर, चांधई, दहीगाव, धोत्रा भांगोजी, गांगलगाव, गीरोला, काटोडा, कवठळ, केळवद, खैरव, कोलारा, कोलारी, मेरा खुर्द, रामनगर, रोहडा, सातगाव भुसारी, सोनेवाडी आणि उत्रादा.
भेंडवळच्या घटमांडणी प्रमाणे घडत आहेत या घटना: आजपर्यंत ही भाकीते झाली खरी; वाचा सविस्तर माहिती
ही गावे HDFC CSR यांनी निवडली असून, या गावांमध्ये WOTR संस्था जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने ग्रामविकास आराखडे (GPDP) तयार करणार आहे. या आराखड्यांचे POCRA योजनेसह शासनाच्या अन्य महत्त्वपूर्ण योजनांशी समन्वय साधून अंमलबजावणी केली जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ चिखली तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि युवकांना मिळावा, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या परिवर्तन प्रकल्पात चिखली तालुक्याचा समावेश निश्चित झाला आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाला नवीन गती प्राप्त होणार आहे.
शाश्वत शेती, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्वावलंबन या सर्व क्षेत्रांत या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.














