Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील सात दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
18 ते 19 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगरांचा समावेश आहे. मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव आणि लातूरच्या काही भागातही 18 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. खान्देशात मध्यम ते जोरदार, तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 ऑगस्टला गुजरातच्या सौराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये 18 ऑगस्टपासून दोन दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल, तर कर्नाटकच्या किनारी भागात आणि केरळच्या काही भागात 20 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (50-60 किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि पूर, भूस्खलन यासारख्या आपत्तींचा धोका वाढू शकतो. मुंबईत 18 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, 19 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहील.














